
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत होणार असलेल्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने युवकांसाठी निबंध आणि युवा रंग काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
येथील नवनिर्माण शिक्षण संस्था आणि राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतत 22 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये युवकांसाठी काव्यवाचन तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ गटामध्ये अभिजात माय मराठी व मला प्रभावित केलेले मराठी पुस्तक असे निबंधाचे विषय आहेत. यासाठी 500 ते 700 शब्दमर्यादा असेल. वरिष्ठ गटामध्ये कोकण बोलीभाषांचे माहेरघर, अभिजात मराठी आणि माझी जबाबदारी हे दोन विषय आहेत. या गटामध्ये 700 ते 1000 अशी शब्दमर्यादा असेल. विद्यार्थ्यांनी आपले नाव, कॉलेजचे नाव, संपर्क क्रमांक नमूद करून आपला निबंध ५ नोव्हेंबरपर्यंत प्राचार्य, एसपी हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. संदीप कांबळे (9422053372), संजय वैशंपायन (94224 36521 ) आणि प्रा. सचिन टेकाळे (94032 57581 )यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युवारंग काव्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ विभागात होणार आहे. युवाशक्ती – नवभारताची कवच-कुंडलं”, “समाजातील बदल” / “संवेदना आणि संघर्ष”, ऑपरेशन सिंधूर : गाथा अभिमानाची , अभिजात भाषा मराठी: मी मराठी, मायमराठी! या विषयावर काव्य लेखन व वाचन स्पर्धा होणार आहे.
उत्तर विभागाची (मंडणगड, खेड, दापोली) स्पर्धा दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वराडकर बेलोसे कॉलेज, दापोली येथे होईल. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पश्चिम विभागाची (गुहागर, चिपळूण) स्पर्धा डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण येथे होईल. दक्षिण विभागाची (लांजा, राजापूर) स्पर्धा ओणी हायस्कूल, राजापूर येथे बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ होईल. मातृ विभाग : (रत्नागिरी, संगमेश्वर) नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी येथील स्पर्धा गुरुवार दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व नवोदित कवी (वयोमर्यादा १६ ते ३५ वर्षे) सहभागी होऊ शकतील. स्वरचित कविता असावी. कविता मराठी भाषेतच असावी. सादरीकरणासाठी ३ मिनिटांचा वेळ दिला जाईल. कवितेची सुवाच्य अक्षरात लिहिलेली/टंकलिखित एक मूळ प्रत आयोजक व परीक्षकांना स्पर्धेआधी द्यावी लागेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ही स्पर्धा चार विभागांत घेतली जाईल. सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील ४ विजेत्यांना (एकूण १६ कवी) रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनात युवा काव्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सन्मान करण्यात येईल. यासंदर्भात कवी अरुण मोर्ये (९१७५५२६६६०/८८०५७०४५५७) यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी