
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.) - आजच्या मोर्चाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली. संयुक्त महाराष्ट्रावेळी असे मोर्चे निघाले होते. काळा घोडा परिसरातील मोर्चे विशेष होते. त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली आहे. आता लोकशाही, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली आली. कारण सरकार सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि मनसे यांच्या वतीने मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला होता. हा मोर्चा फॅशन स्ट्रीट, मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबला. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यात पवार बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, आमचे पक्ष वेगळे आहेत. विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेद असतात. पण देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल, तर तुम्हाला मला एक व्हावे लागेल. व्यासपीठावरील नेत्यांच्या वतीने आम्ही हा निकाल घेतला. मतचोरी थांबवू आणि लोकशाही कशी टिकेल याची खबरदारी घेऊ. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.
निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीत जे काही झालं. त्यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवर जो विश्वास होता त्याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आहे. या सगळ्याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकांमध्ये संघर्ष असू शकतात पण या सगळ्या गोष्टी विसरुन आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीचा जो अधिकार आहे तो आपल्याला जतन करावं लागेल. हाच दृष्टीकोन समोर ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल. काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केली. बनावट आधारकार्ड तयार करुन मिळतात अशा त्या तक्रारी होत्या. कलेक्टर म्हणाले सिद्ध करा, पुरावे दिले गेले. मात्र ज्यांनी आरोप केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला समर्थन देतं आहे. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. पण देशाची संसदीय लोकशाही ही टिकवायची असेल, मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावं लागेल, असे आवाहन पवारांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी