
सोलापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)।
अडचणींचा सामना करत असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मदतीला आमदार सचिन कल्याणशेट्टी धावले. त्यामुळे अखेर कारखान्याच्या २०० कोटींच्या कर्जास राज्य सरकारने थकहमी दिली आहे. त्यानंतर कारखान्याने गाळप हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानले. तसेच या हंगामातही अन्य कारखान्यांच्या तुलनेत चांगला दर देण्याची ग्वाही दिली. कुमठे (ता. उत्तर सोलापूर) येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार करतानाच विधानसभा निवडणुकीतही भाजपला आव्हान दिले होते. नंतर अडचणीत सापडलेल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या कर्जाला राज्य सरकारकडून थकहमी मिळत नसल्याने त्यांना संघर्ष करावा लागत होता. दरम्यान, त्यांच्या भाजप प्रवेशाचीही चर्चा रंगली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड