
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
दिव्यांगांच्या कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नागरी समाज संघटना व संस्थांची नोंदणी दि.३० पर्यंत करण्यात यावी असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी केले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९ ते ५३ नुसार ही नोंदणी करणे अनिवार्य आहे, असेही कळविण्यात आले आहे.
या नोंदणीसाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा व्यक्ती, संस्था किंवा संघटना ज्यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे, त्यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या संस्था अथवा व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे आढळल्यास, त्यांच्या विरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ कलम ९१ नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच शासनाच्या दि.१७ ऑक्टोबर २०२५ च्या निर्णयानुसार, वैध नोंदणीशिवाय कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना दिव्यांग क्षेत्रात कार्य करू शकत नाही. वैध नोंदणीशिवाय कार्य करणाऱ्या संस्थांवर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट तरतूद आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis