
रत्नागिरी, 2 नोव्हेंबर, (हिं. स.) | रत्नागिरीत जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे ४५२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरूच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस वाढतच असल्याने अधिकाधिक क्षेत्र बाधित होत आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, जिल्ह्यातल्या ३२४ गावांमधल्या २४५२ शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, ४५२ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या शेतीचे नुकसान झाले आहे. अगदी हातातोंडाशी आलेल्या भात आणि नाचणीच्या पिकाची वाताहत झाली आहे. पेंढाही भिजल्यामुळे जनावरांच्या वैरणीचाही तुटवडा भासणार आहे.
पावसाळी वातावरणामुळे आंबा-काजूच्या मोहोरावर दुष्परिणाम झाला असून, पुढच्या हंगामातल्या शेतीचे नियोजनही कोलमडले आहे. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी पावसाने विश्रांती घेतली असून, अनेक दिवसांनी सूर्यदर्शन झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी