
अमरावती, 2 नोव्हेंबर (हिं.स.) - शेतकरी आंदोलन संपल्यानंतर अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमागे भाजपचा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
कडू म्हणाले, “आमच्यावर जाणूनबुजून बदनामीचे षड्यंत्र रचले जात आहे. पण हे प्रयत्न त्यांनाच महागात पडतील. एक दिवस जनता त्यांच्या विरोधात उभी राहील.” या प्रकरणावर कायदेशीर कारवाईसाठी पाच वकिलांची टीम नेमण्यात आल्याचे कडू यांनी सांगितले. “या लोकांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई कशी करायची, त्यांना कसे थांबवायचे, यावर आमची टीम काम करेल,” असे ते म्हणाले.
भावनिक होत कडू म्हणाले, “इतक्या प्रामाणिकपणे काम करूनही लोक चुकीच्या पद्धतीने बोलतात, हे दु:खद आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी मनापासून काम केले आहे, पण आता जे बदनामीचा प्रयत्न करतील त्यांना प्रत्युत्तर मिळेल.” त्यांनी सांगितले की अनेक जिल्ह्यांत तक्रारी दाखल करण्यात येत असून लवकरच सर्वांवर कारवाई सुरू होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी