
मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारजी, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?”
महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, पिकांच्या नुकसानीमुळे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणीत आहेत. “हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात, पण तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही,” असे ते म्हणाले.
सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये असूनही शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत असल्याचा मुद्दा मांडत आंबेडकर म्हणाले की, “याचा अर्थ शेतकऱ्यांना जवळजवळ ३० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. कापसाची स्थितीही तितकीच गंभीर आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांतील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली, आणि त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या.”
सरकारच्या निष्क्रीय भूमिकेवर टीका करत आंबेडकर म्हणाले, “तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का? शेतकऱ्यांना भिक नको, त्यांना त्यांचे हक्क हवेत!”
वंचित बहुजन आघाडीने अजित पवार यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध नोंदवला असून, राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी