
सोलापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। आढीव (ता. पंढरपूर) येथील एका प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आवश्यक ती चाचणी न करता चुकीचे रक्त चढविल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिल्याने व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. आरती सूरज चव्हाण (वय २२) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. आरती चव्हाण ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी पंढरपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितले. त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आले. मात्र, रक्त चढविल्यानंतर तिचा त्रास आणखीच वाढत गेला आणि तीन दिवसांनंतर तिचा सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. कुटुंबाने रक्त संकलन केंद्रावर गंभीर आरोप केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड