
कोल्हापूर, 6 डिसेंबर (हिं.स.)। इचलकरंजीतील येथील एका तरुणाचे तिघानी मोटरसायकल रिपेअरच्या बहाण्याने अपहरण करून त्याचा कर्नाटकातील निपाणीत नेऊन निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुहास सतिश थोरात (वय १९, रा. भोनेमाळ, इचलकरंजी) असे अपहृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सुहास याला शुक्रवारी (ता. ५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओंकार अमर शिंदे, ओंकार कुंभार (सर्व रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) यांसह एक अल्पवयीन अशा तिघांनी मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले. मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी याबाबत शुक्रवारीच शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली.
सुहासचा शोध सुरू असताना शनिवारी पहाटे निपाणी येथील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर मारहाणीचे व जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अपहरणापासून खूनापर्यंतचे सर्व धागे दोरे तपासात उघड झाले आहेत.
सुहासला कोठून कुठे, कसे नेण्यात आले, खून नेमका कशामुळे झाला, यात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास सुरू आहे. सुहास थोरातचा निघृण खून उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात नातेवाईक व मित्रपरिवाराने गर्दी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar