
पुणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे प्रतिबिंब जरकोणत्या शहरात दिसत असेल,तर ते म्हणजे पुणे. विद्यापीठे,प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुसंस्कृत समाज यांच्या माध्यमातून पुणे नेहमीच शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. आता आपल्या पुढचे मोठे आव्हान म्हणजे शिस्तबद्ध आणि शाश्वत वाढ साध्य करणे,जेणेकरून भावी पिढ्यांसाठी हे शहर राहण्यायोग्य आणि उत्साही राहील,असे मत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक यांच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिस चे संस्थापक व अध्यक्ष आणि सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां ब. मुजुमदार उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. राम म्हणाले, “बाबासाहेबांना खरं अभिवादन म्हणजे त्यांचे विचार आचरणात आणणे. फुले अर्पण करणे सोपे आहे;परंतु त्यांचे तत्त्वज्ञान जगणे तितकेच कठीण आहे. बाबासाहेबांनी सुशिक्षित,कुशल आणि सुसंस्कृत समाजाची कल्पना मांडली होती. एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचे मोजमाप ते त्या समाजातील महिलांच्या स्थितीतून करीत. ही मूल्येच आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरली पाहिजेत.”
नागरी प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सहकार्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सांगितले, “नागरिक मंच अधिक सक्षम केले जातील आणि पुणे महानगरपालिकाव शैक्षणिक संस्थांमधील भागीदारी आणखी मजबूत केली जाईल. नागरिकांचे आवाज ऐकल्यावरच त्यांच्या अपेक्षा,गरजा आणि दृष्टिकोन अधिक स्पष्टपणे समजतात;आणि त्यामुळे आपण अधिक प्रभावीपणे शासन करू शकतो.”
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वैचारिक स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले.“मनाचे स्वातंत्र्य म्हणजेच खरे स्वातंत्र्य. ज्याचे मन मोकळे नाही,तो अद्यापही बंधनातच जगतो. खरी मुक्ती स्वतंत्र आणि चिकित्सक विचारातूनच येते,”असे ते म्हणाले. सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा संदर्भ घेत त्यांनी सांगितले की, “आज आपल्या समाजातील अनेकांची मने दूषित होत आहेत. माहितीचा गैरवापर,पूर्वग्रह,आणि राजकीय अजेंडे यांच्या प्रभावामुळे. डॉ. बाबासाहेबांचा संदेश आपल्याला या सर्वांवर मात करून विवेकाने विचार करण्यास आणि मानवी प्रतिष्ठा जपण्यास शिकवतो. महापरिनिर्वाण “हा दिवस केवळ स्मरणाचा नाही;तर बाबासाहेबांनी मांडलेल्या मूल्यांचे पालन करण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी पुन्हा अधोरेखित करतो असे देखील डॉ. मुजुमदार यांनी पुढे बोलताना सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु