
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.
पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) व मागील सात वर्षांतील चांगल्या पाच वर्षांतील उत्पन्नाची तुलना होते. त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमेची रक्कम निश्चित होते. त्यातही प्रत्येक पिकांसाठी मंडळे, तालुके अधिसूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार त्या मंडळ व तालुक्यातील पीकविमा भरलेल्या बाधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम दिली जाते.
एखाद्या मंडळ किंवा तालुक्यातील सर्वच पिकाचे नुकसान झाले, पण त्याठिकाणी त्या पिकांसाठी अधिसूचित केलेले क्षेत्र नसल्यास विमा मिळत नाही. आता कोणत्या तालुक्यातील किंवा मंडळातील किती शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड