
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)वीजबिलाचा वेळेत भरणा नाही, विजेच्या तारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणे, अशा प्रकारांमुळे ‘महावितरण’ने आता प्रत्येक ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर शहरातील ६५ हजार तर ग्रामीणमधील एक लाख ८५ हजार घरात ते मीटर बसविले आहेत. उर्वरित पाच लाख २० हजार २८० ग्राहकांच्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविले जाणार आहे.
सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात ‘महावितरण’चे सात लाख ७२ हजार ६१३ घरगुती ग्राहक आहेत. त्यापैकी ४२ टक्के ग्राहक दरमहा नियमित भरतात आणि बाकीचे ग्राहक विलंबाने (दोन-तीन महिन्यांनी) भरतात. दरवेळी थकबाकीतील ग्राहकांवर कारवाईची मोहीम राबवावी लागते, त्यावेळी वादविवाद होतात. पोलिसांत देखील खटले दाखल होतात. या सर्व बाबींवर आता स्मार्ट मीटर रामबाण उपाय असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. या मीटरमुळे ग्राहकांना सकाळी ९ ते पाच या वेळेत वीज वापर केल्यास त्यावर ‘टीओडी’अंतर्गत (टाइम ऑफ डे) प्रतियुनिट ८० पैसे सवलत दिली जात आहे.
पुढे ही सवलत एक ते दीड रुपयांपर्यंत असणार आहे. या मीटरमुळे आपण कोणत्या वेळेत किती वीज वापरली, त्याचे बिल किती रुपये झाले हे घरबसल्या समजते. दुसरीकडे ‘महावितण’ला देखील वीज वितरणाचे नियोजन करणे सोपे झाले आहे. वीजचोरी, गळती रोखण्यासाठी हे मीटर उपयोगी ठरत आहे. आता कोणी विरोध करीत असेल, पण त्यांना पुढे स्मार्ट मीटर बसवावेच लागणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड