
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। एकेकाळी जळगावची केळी प्रसिध्द होती परंतु अलिकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणपरिसरात केळींची लागवड वाढू लागली असून गेल्या पाच वर्षात निर्यातीचा आलेखही चढता असल्याने सोलापूर जिल्हा आता केळीचे हब बनू लागला आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यातून ३९ हजार ७२७ कंटेनर निर्यात होऊन ४ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात केळी पिकासाठी योग्य हवामान असल्याने निर्यातक्षम केळीचे पीक वर्षभर घेतले जाते. शेतकऱ्यांनी बाजारातील चढ-उतार पाहून लागवडीचा कालावधी ठरवावा व टप्प्याटप्प्याने लागवड करावी यामुळे नुकसान होणार नाही.वर्षभरात १५ लाख मे.टन केळीचे उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशांत निर्यात केली जाते.जिल्ह्यातील करमाळा, माढा हे दोन तालुके केळीचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.टेंभुर्णी परिसरात देशातील सर्व प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी आपली कार्यालये उघडली सोलापूर जिल्ह्यात मात्र निर्यातदारासाठी संपूर्ण वर्षभर केळी उपलब्ध असतात. यामुळे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड