दिल्ली : एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : दिल्लीतील जुन्या सीमापुरी परिसरात घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुं
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घर


नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : दिल्लीतील जुन्या सीमापुरी परिसरात घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. डासांसाठी लावलेल्या कॉईलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.

अग्निशमन दलाला आज, मंगळवारी पहाटे 4 वाजता ओल्ड सीमापुरी परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र अग्निशमन दलाचे जवान घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले असता एका खोलीत कुटुंबातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळलेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही लोक घराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका छोट्या खोलीत मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये होरीलाल (वय 58) , त्यांची पत्नी रीना, त्यांचा मुलगा आशू आणि मुलगी रोहिणी यांचा समावेश आहे. होरीलाल शास्त्री हे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी होते आणि मार्च 2022 मध्ये ते निवृत्त होणार होते. तर त्यांची पत्नी एमसीडीमध्ये सफाई कामगार होती. आशू बेरोजगार होता तर रोहिणी सीमापुरी येथील सरकारी शाळेत बाराव्या वर्गात शिकत होती. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. मच्छरांसाठी लावलेल्या कॉईलमुळे आग लागली आणि त्यामुळे झालेल्या धुरामुळे सर्वाचा गुदमरून मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर, चारही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रात्री सर्व जण झोपलेले असल्यामुळे घरात आग लागल्याचे कुणालाच कळू शकले नाही आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे या घटनेच्या सखोल चौकशीनंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande