मुंबई, १ ऑक्टोबर (हिं.स.) : पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये दुचारीवरून आलेल्या दोन तरुणांनी चार तरुणांवर चार राऊंड गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात अंकित यादव या तरुणाचा मृत्यू झाला असून अविनाश दाभोळकर, मनिष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहीहंडीच्या वेळी झालेल्या भांडणाचा बदला म्हणून हा गोळीबार झाला. गोळीबार करणारे आणि झालेले असे दोन्ही बाजूचे तरुण हे आजूबाजूच्या परिसरात राहणारे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात शुक्रवारी रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. दोन जण दुचारीवरून आले आणि त्यांनी चार तरुणांवर गोळीबार केला. या घटनेत अंकित यादव हा तरुण मृत्यू झाला. तर अविनाश दाभोळकर, मनिष गुप्ता आणि प्रकाश नारायण हे तीन तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्राथमिक तपासात चार राऊंड गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबारानंतर दुचाकीवरून आलेले दोन्ही तरुण पसार झाले. दरम्यान कांदिवली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार