* गोव्यात शनिवारी ‘विविधता, सर्वसमावेशकता व परस्पर आदर’ विषयावर ‘सी 20’ परिषद !
पणजी, 26 मे (हिं.स.) : विश्वातील अनेक देश भारतापेक्षा अधिक संपन्न, तसेच संपत्ती, शस्त्रास्त्रे आणि विकास यांत खूप पुढे आहेत; पण भारत हा अध्यात्म क्षेत्रातील गुरु आहे. अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती आहे. विश्वभरात ज्या काही समस्या आहेत, त्याचे उत्तर हे अध्यात्मातून मिळू शकते. या दृष्टीनेच आंतरराष्ट्रीय ‘जी-20’च्या अंतर्गत असलेली ‘सी-20’च्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील प्रथमच आयोजित ‘सी-20’ परिषद ही ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर होणार आहे. 27 मे 2023 या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ‘राजहंस नौदल सभागृह’, दाबोलीम, वास्को येथे ही परिषद संपन्न होत आहे. तरी या ‘सी-20’ परिषदेत सहभागी व्हा, असे आवाहन ‘सी-20’ परिषदेच्या आंतरराष्ट्रीय समन्वयक तथा नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्’च्या अध्यक्षा प्रा. डॉ. शशी बाला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. या वेळी पत्रकार परिषदेला ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन समन्वयक सौ. श्वेता आणि डॉ. (सौ.) अमृता देशमाने या उपस्थित होत्या.
या ‘सी-20 परिषदे’चे आयोजन गोवा सरकार, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी दिल्ली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. भारत का ‘जी-20’ अध्यक्षपद विश्व को ‘उपाय, सुसंवाद एवं आशा का संदेश देनेवाला सिद्ध हो’, इस हेतु सभी मिलकर उसका समर्थन करें, ऐसा आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने किया है । भारतातील ‘सी-20’ परिषदेच्या अध्यक्षस्थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्या संस्थापिका परमपूज्य माता अमृतानंदमयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेला गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. श्वेता यांनी या वेळी दिली.
प्रा. डॉ. शशी बाला पुढे म्हणाल्या की, आर्थिक संकट आणि हवामान बदल, आतंकवाद, महामारी यांसारख्या जागतिक समस्या यांच्या विरोधात लढण्यासाठी, तसेच अन्न, खते, वैद्यकीय उत्पादने यांच्या जागतिक पुरवठा राजकारणाच्या प्रभावातून बाहेर काढणे, भू-राजकीय तणाव टाळणे, मानवतेसाठी कार्य करणे, तसेच युद्ध आणि आतंकवाद थांबवणे या उद्देशाने ‘जी-20’ची निर्मिती झाली. त्यामुळे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे ‘जी-20’चे ब्रीदवाक्य आहे. यंदाच्या वर्षी ‘जी-20’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. ‘जी-20’च्या अंतर्गत ‘सी-20’ अर्थात् ‘सीव्हील 20’चे #YouAreTheLight हे ब्रीदवाक्य आहे. या ‘सी-20’ परिषदेच्या अंतर्गत आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, तंत्रज्ञान, पारंपारिक कला, संस्कृतीचे जतन अन् संवर्धन आदी 14 प्रकारचे विविध गट कार्यरत आहेत. त्यातील केवळ ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-20 परिषदां’चे आयोजन भारतातील बिलासपूर, बेंगळुरू, दिल्ली, नागपूर, इंदोर, हमरीपूर, रांची आदी ठिकाणी प्रत्यक्ष झाले असून बाली, थायलंड आदी देशांत ऑनलाईन परिषदा संपन्न झाल्या आहेत. या पुढे 10 हून अधिक ठिकाणी या परिषदांचे आयोजन होणार आहे. या सर्व 14 विषयांवरील ‘सी-20’च्या देशभरातील कार्यक्रमांमध्ये 2 हजारांहून अधिक संस्था आणि संघटना सहभागी झाल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार