नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड', यांनी आज (1 जून) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
मुर्मू यांनी प्रचंड यांचे स्वागत केले आणि नेपाळच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताबरोबरचे त्यांचे जुने संबंध आणि त्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांची जुनी भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी भारत सकारात्मक असल्याचे मुर्मू म्हणाल्या. या भेटीमुळे दोन देशांतील आधीच मजबूत असलेले संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अलीकडच्या वर्षांत भारत-नेपाळ द्विपक्षीय सहकार्य अधिकाधिक मजबूत होत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. कोविड-19 महामारीच्या कठीण काळातही दोन्ही देशांमधील व्यापार व्यवस्थित सुरू होता असे त्या म्हणाल्या.
भारत आणि नेपाळमधील सीमा खुल्या असल्यामुळे दोन्ही बाजूंनी पर्यटनाला चालना मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. जनसंपर्क आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी आध्यात्मिक पर्यटन पुन्हा सुरू करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. सिस्टर सिटी करार आणि आर्थिक कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा यामुळे दोन्ही देशांमधील पर्यटनाला चालना मिळू शकते, असे त्यांनी सूचित केले.
भारत नेपाळला प्राधान्य देतो. दोन देशातील महत्त्वाचे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याबरोबरच विकास-भागीदारी पुढे नेण्यासाठी भारत उत्सुक आहे, असेही त्या म्हणाल्या.
हिंदुस्थान समाचार