अमरावती, 3 जून (हिं.स.) महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एक महिन्यापूर्वी 120 रुपये किलोने मिळणारी तूर डाळ आता 140 ते 150 रुपये किलो दराने विकली जात आहे. पुन्हा भाव वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
डाळीच्या प्रकारामध्ये तूर डाळ ही अतिशय महत्त्वाची आहे. भाजीसोबत प्रत्येक दिवशी तूर डाळीचे वरण बनविले जाते. इतर डाळींपेक्षा तूर डाळ पौष्टिक असल्याने, लहान मुलांसाठी तूर डाळीचे वरण पाजण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जाते.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात तूर डाळ पिकते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही या डाळीचा वापर आहारात करतात. शहरवासीयांना मात्र दुकानातून डाळखरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतातून तूर निघते. एप्रिलमध्ये डाळ तयार करून विकली जाते. अनेक नागरिक पावसाळ्यापूर्वी डाळीची खरेदी करतात. मागणी वाढल्याने तूर डाळीचे दर वाढले आहेत.
■ पुढील मार्च महिन्याशिवाय तूर डाळीचे उत्पादन होणार नाही. शेतकऱ्यांनी आपल्याजवळचे तुरीचे पीक व्यापाऱ्यांना विकले आहे. त्यामुळे डाळ आता केवळ व्यापाऱ्यांकडे आहे. त्यामुळे दर वाढणार आहेत.
इतर डाळींचे दर काय?
डाळ दर (प्रति किलो)
हरभरा 70 रु
मसूर 90 रु
उडीद 120 रु
मूग 110 रु
हिंदुस्थान समाचार