
चंद्रपूर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।या वर्षातील वाघांच्या स्थानांतरणाच्या प्रक्रियेसाठी भारतीय वन्यजीव संस्थानाच्या संशोधकांच्या प्रयत्नाला पहिल्या टप्यात यश आले आहे. बुधवारी वनविभागाच्या नोंदीत 'टी२०एसएफ२' नाव असणाऱ्या चंदा या वाघिणीला बेशुद्ध करून पकडल्यावर तिचे स्थानांतरण करण्यासाठी रात्रीच सह्याद्रीकडे तिला वन्यजीव परिवहन वाहनातून रवाना करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा ती सह्याद्री प्रकल्पात दाखल होणार आहे. दरम्यान तेथील अधिवासात स्वतःला यशस्वीपणे जुळवून घेतल्यावर दुसऱ्या चांदणी वाघिणीचे स्थानांतरण केले जाणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघांना स्थलांतरित करण्याचा या वर्षातील नवा उपक्रम आहे. २०२३ आणि २०२४ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तीन वाघिणींचे यशस्वीरित्या स्थानांतरण करण्यात आल्यावर हा राज्यातील दुसरा मोठा वाघिणी स्थानांतरण प्रयोग आहे.
बुधवारी सुमारे दोन वर्षांची वाघिणी 'चंदा' ला ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मधील खडसंगी वन परिक्षेत्रामधून बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात आले आणि त्याच रात्री उशिरा सह्याद्रीच्या खडकाळ पश्चिम घाट प्रदेशात स्थानांतरित करण्यासाठी पाठविण्यात आले. डेहराडूनच्या 'वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' आणि 'एसटीआर'च्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या 'रॅपिड रेस्क्यू टीम'ने केलेले हे ऑपरेशन सुरळीतपणे पूर्ण झाले. वाघिणीला रस्त्याने एका खास सुसज्ज वन्यजीव परिवहन रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.या पुनर्वसन कार्यक्रमासाठी चार कुंपण तयार केले गेले आहेत. त्यापैकी एका कुंपणात असलेली वाघिण चंदाला खुल्या वनक्षेत्रात सोडल्यानंतर तिचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. अलिकडच्या वर्षांत वाघांची संख्या कमी झालेल्या सह्याद्रीच्या लँडस्केपमध्ये वाघांची संख्या पुनर्संचयित करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव