
प्रशासन व लोकप्रतिनिधींवर उदासीनतेचा आरोपदिंडोरी, 12 मार्च (हिं.स.) : दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन शासकीय व निमशासकीय अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शासकीय कामांसाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते, तसेच लहान-मोठ्या कामांसाठीही वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मतदारसंघातील नागरिकांच्या मते, यामागे लोकप्रतिनिधींची राजकीय उदासीनता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे प्रमुख कारण आहे. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी महायुती सरकारमध्ये सत्तेत असून मंत्रीपदही भूषवत आहेत. मात्र, मतदारसंघातील प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या मते, अनेक शासकीय तक्रारींवर उपाययोजना करण्याऐवजी त्या प्रलंबित राहतात. त्यामुळे “भीक नको पण कुत्रा आवर” अशी म्हणण्याची वेळ आल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. काही नागरिकांनी असेही म्हटले की, काही ठराविक व्यक्ती व कार्यकर्ते राजकारणाचा गैरफायदा घेत असल्याने सामान्य लोकांची कामे अधिकच अडथळ्यात येत आहेत.
या संदर्भात भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांना विचारले असता, नागरिकांनी व्यक्त केलेल्या काही तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे त्यांनी मान्य केले. महायुतीतील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष देऊन शासकीय व निमशासकीय कामे अधिक सहज व सुलभ कशी होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV