
रायगड, 03 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चा आगामी वर्धापनदिन यंदा ऐतिहासिक किल्ला रायगड येथे साजरा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मनसेचा वर्धापनदिन दरवर्षी राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची निवड होण्याची चर्चा रंगली आहे. रायगड हे मराठी स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळावर वर्धापनदिन साजरा करण्यामागे मराठी अस्मिता आणि शिवकालीन वारशाचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सोशल मीडियावर यासंदर्भातील चर्चा आणि तयारीचे संकेत दिसत आहेत. कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा सोहळा रायगडावर झाला, तर तो केवळ पक्षाचा कार्यक्रम न राहता मराठी अस्मितेचा भव्य सोहळा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सर्वांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके