
डेहराडून, 24 मे (हिं.स.)। उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ यात्रेदरम्यान कंचनगंगा परिसरात हिमस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चमोलीचे जिलाधिकारी गौरव कुमार यांनी रविवारी माहिती देताना सांगितले की, हिमस्खलन रस्त्यापर्यंत पोहोचले नाही आणि ते दरीच्या भागातच थांबले. त्यामुळे वाहतूक किंवा जनजीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांनी सांगितले की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून पर्वतीय भागांमध्ये अशा घटना वेळोवेळी घडत असतात.
जिलाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने संबंधित परिसरातील निगराणी वाढवली असून विविध विभागांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यात्रा व्यवस्थापन सुरळीतपणे सुरू आहे.
जिलाधिकारी गौरव कुमार यांनी नागरिकांना सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे उंच भागांतील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे हिमखंड तुटून खाली घसरून येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. उन्हाळ्याच्या काळात कंचनगंगा आणि आसपासच्या भागांत यापूर्वीही अशा नैसर्गिक घटना घडल्या आहेत. संवेदनशील भागांमध्ये सातत्याने निगराणी ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule