जळगाव, 1 ऑक्टोबर (हिं.स.): सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याच्या मुलाला दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम महादू पाटील (वय ५३, रा. मुंदखेडे बु., ता. चाळीसगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी जळगाव रेल्वेस्टेशनकडून सार्वजनिक रस्त्यावर ही रक्कम संबधित संशयित आरोपींना देण्यात आली. यावेळी बाळासाहेब ऊर्फ ज्ञानेश्वर हरचंद पाटील (रा. उत्राण, ता. एरंडोल), भिवसन महाले (रा. मेहुटे, ता. पारोळा) आणि खंडू बापू महाले (रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) या तीन संशयितांनी संगनमत केले. त्यांनी फिर्यादीच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत शांताराम पाटील यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणुकीनंतर शांताराम पाटील यांनी हे पैसे परत मिळावेत, यासाठीची मागणी केली असता, खंडू महाले याने शांताराम पाटील यांना फोनद्वारे शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर