मुंबई, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे.
गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम असून १०० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकं, फळबागा बाधित झाल्या आहेत. लाखो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो जनावरांचा मृत्यू झाला, लाखो घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व वस्तूंची प्रचंड नासाडी झाली आहे. हजारो घरे कोसळल्याने लोकं बेघर झाले आहेत. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करू प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपये मदत द्यावी व विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी काँग्रेस पक्ष सातत्याने करत आहे. पण सत्तेच्या मस्तीत मदमस्त झालेले महाभ्रष्ट महायुती सरकार या संकटाकडे डोळेझाक करत आहे.
या मुक्या बहि-या सरकारला जागे करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसतर्फे मोर्चा, धरणे / आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर