सोलापूर, 10 ऑक्टोबर, (हिं.स.)। तलाठ्यांनी लावलेली जमिनीची नोंद मंडलाधिकाऱ्यांनी फेटाळली. ऑनलाइन नोंद लावण्यासाठी करकंबचा मंडलाधिकारी राजेंद्र भगवान वाघमारे (वय ५३, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) याने लाच मागितली. ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदाराने जमीन घेतली होती. तलाठ्याने नियमानुसार जमिनीची नोंद लावली होती. पुढील मंजुरीसाठी तलाठ्यांनी ती नोंद मंडलाधिकाऱ्यांकडे पाठवली होती. ती नोंद फेटाळल्याचे मंडलाधिकारी वाघमारे याने सांगितले, पण नोंद धरण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तक्रारदाराने ४० हजार रुपये देण्याचे ठरले.
मात्र, रितसर नोंदीसाठी मंडलाधिकारी लाच मागत असल्याची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा केली आणि पुण्याच्या पथकाने सापळा रचला. मंडलाधिकाऱ्याने लाचेची रक्कम स्विकारण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयामागील रायगड भवनमागे बोलावले होते. त्याठिकाणी रक्कम घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पाहताच रक्कम तेथेच टाकून त्याने पळ काढला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड