रत्नागिरी, 12 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातील जनसेवा ग्रंथालयातर्फे कवी विजयानंद जोशी लिखित 'थोडं कळत थोडं नकळत' या कविता व गझलसंग्रहाचे प्रकाशन येत्या २५ ऑक्टोबरला होणार आहे.
साहित्य आणि वाचन चळवळ वृध्दिंगत व्हावी, यासाठी जनसेवा ग्रंथालय कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते प्रकाशन होईल.
प्रकाशन सोहळ्यानंतर कवी विजयानंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे बहारदार काव्यसंमेलन होणार आहे. त्यामध्ये संजय कुळ्ये, शुभम कदम, नितीन देशमुख, अरुण मौर्य, अर्चना देवधर हे कवी सहभागी होतील. हा कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाला समस्त काव्यप्रेमी, साहित्यप्रेमी, वाचक, सभासद, हितचिंतक, देणगीदार, विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी आणि कार्यवाह ओंकार मुळ्ये यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी