कोल्हापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
गोकुळमधील सत्तारूढ आघाडीच्या विरोधात असलेल्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात
फरक बीलातून ४० टक्के रक्कम डिबेंचरसाठी कपात केल्याच्या विरोधात गोकुळच्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला.
सत्तारूढ आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आ. सतेज पाटील यानी यावर प्रतिक्रिया देताना डिबेंचरमधूनही संस्थाना चांगला परतावा मिळणार असूनही त्या बाबत समजून घेतले नाही. ही आमच्या काळजाला बसलेली ठेच आहे असे म्हणत डिबेंचरचा मुद्दा चर्चेला येणार नाही अशी दक्षता घेण्याच्या सुचना संचालक मंडळाला दिल्या.
जनावरे घेऊन थेट गोकुळ कार्यालयामध्ये घुसवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापट झाली. डिबेंचर'वरून मोर्चा निघाल्यानंतर आता गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गोकुळवर काढण्यात आलेला मोर्चा हा आमच्या काळजाला ठेच असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
त्यांनी सांगितले डिबेंचरचा अभ्यास करून शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेऊन त्या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. विनाकारण गैरसमज होईल असं काही करू नका, पुढीलवेळी हा मुद्दा येणार नाही याची काळजी घ्या असं त्यांनी संचालक मंडळाला सांगितले. संकलन 25 लाख लिटर झाले पाहिजे याबाबत प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.
यावेळी, सतेज पाटील म्हणाले आम्ही कुणाचा जावई मोठा करण्याचा प्रयत्न केला नाही. असं म्हणत त्यांनी महाडिकांना टोला लगावला. गाय आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करून आम्ही शेतकऱ्यांना मदत केली आहे. गोकुळ शेतकऱ्यांचा राहावा, एकट्याच्या ताब्यात राहू नये असं काम केलं असल्याचे सांगत शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे. डिबेंचरबाबत कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात पुन्हा डिबेंचरचा मुद्दा येणार नाही याची काळजी घेऊ असेही ते म्हणाले. संचालक बोर्डाने या मुद्द्यावर सह्या केल्या त्यांची नाव सुद्धा जाहीर करा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. संचालक बोर्डात एक भूमिका घ्यायची आणि बाहेर एक भूमिका घेतली जाते असा टोला त्यांनी शौमिका महाडिक यांना लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar