मुंबई, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची पराभवाच्या भीतीने गाळण उडली असून त्या निराशेतून संजय राऊत फुटकळ आरोप करत आहेत. काही ना काही निमित्त करून निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा डाव आहे अशी जोरदार टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बिहारमध्ये मतदार याद्यांत सुधारणा करण्यासाठीचे अभियान झाले तसे अभियान महाराष्ट्रातही करावे अशी मागणी संजय राऊत, उद्धव ठाकरे करणार का असा सवालही श्री. बन यांनी केला. बिहारमध्ये झालेल्या मतदार यादी दुरुस्ती (एसआयआर)ला विरोध करायचा आणि आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका पुढे ढकला अशी मागणी करण्याचे नाटक संजय राऊतांकडून सुरु आहे, असा टोला श्री. बन यांनी लगावला.
नोटबंदीवरून राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत श्री. बन म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे राऊतांना त्यांच्याकडे असलेला प्रचंड काळा पैसा पांढरा करता आला नाही. त्यामुळे त्यांना नोटबंदीमुळे पोटदुखी होणारच असा टोला त्यांनी लगावला. गुजरात पॅटर्न उबाठा गटात राबवावा
राऊतांमुळे उबाठा गटाची कोंडी होत असून अवस्था दयनीय होत असल्याने उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात गुजरात पॅटर्न राबवून राऊत यांना हटवावे, असा खोचक सल्लाही श्री. बन यांनी दिला.
संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर सुपरस्टार प्रचारक असे संबोधत केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेत श्री. बन म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना तीन वेळा जनतेने निवडून दिले आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राचे राजकीय सुपरस्टार आहेत. उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या नेतृत्वात सातत्याने अपयश पदरी पडत असल्याने सर्वात मोठे लूजर कोण असतील तर ते राऊत आहेत असा घणाघात श्री. बन यांनी केला.
दिवाळी हा बळीराजाचा सण आहे. मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतक-यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा होत आहेत. 32 हजार कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. संकटकाळी शेतक-यांना नवी उमेद देऊन त्यांना आधार देण्याची गरज असताना, शेतक-यांनी दिवाळी साजरी करू नये असे म्हणणे म्हणजे त्यांना नाउमेद करणे होईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अशी विधाने टाळावीत. दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला खरेतर पवारांनी, जोषात दिवाळी साजरी करणा-या उबाठा गट आणि मनसेला द्यावा अशीही पुस्ती त्यांनी जोडली. भाजपाचे मंत्री, नेते, कार्यकर्ते हे शेतकऱ्यांसोबत जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. पालावर जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. शेतकरी, भटक्या जमाती यांना फराळ, कपडे यांचे वाटप करून प्रत्येकाच्या चेह-यावर हास्य फुलवून अस्मानी संकटामुळे आलेले नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही श्री. बन यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर