मुंबई, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर आशा, उत्साह आणि नवसंकल्पांचा सण आहे. या तेजोमय पर्वातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी एकजुटीने काम करूया. राज्याच्या सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही शासन कटिबद्ध असून या दिशेने आम्ही अथक प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बळीराजा संकटात असताना त्यांची दिवाळी कडू होणार नाही याची पूर्ण काळजी शासनाने घेतली आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सरकारने प्राधान्याने केले आहे. ही दिवाळी त्यांच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो आणि त्यांचे दुःख, संकटे दूर होवोत, अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत ते म्हणाले, शेतकरी असो वा कर्मचारी, समाजातील प्रत्येक घटकाला आनंदात ठेवणे हेच आमच्या 'महायुती' सरकारचे उद्दिष्ट आहे.
दिवाळीच्या उत्साहात पर्यावरणाचे भान राखण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. प्रदूषण टाळून, आनंद आणि सुरक्षित वातावरणात हा सण साजरा करावा. असे सांगून हा दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर