जळगाव, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) -तालुक्यातील भागदरा गावात कर्जबाजारीपणाच्या ताणातून एका ३५ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव प्रकाश नामदेव कांबळे (वय ३५) असे असून, तो गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता.
या तणावाला कंटाळून त्याने काल रात्री स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भागदरा गावात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर