नागपूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती स्थानी असून त्यात देशाच्या एव्हिएशन क्षेत्राचे केंद्र बनण्याची क्षमता आहे. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये सुरक्षिततेसोबत कुठलीही तडजोड न करता या क्षेत्रात जबाबदारीने काम करून या क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. 'विकसित भारतामध्ये उड्डयन क्षेत्राची भूमिका' या विषयावर आयोजित परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते .
एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीने 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या परिषदेमध्ये केंद्रीय उड्डयन मंत्रालय, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्याचे विमान वाहतूक क्षेत्रातील भागधारक उपस्थित आहेत . या कार्यक्रमाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक योगीराज सोरटे, एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाचे महासचिव आलोक यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी भारतीय विमान उड्डयन क्षेत्राच्या प्रगती बद्दल बोलताना गडकरी यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात देशातील विमानतळांची संख्या 75 वरून 150 झाली असून हवाई उड्डायन क्षेत्रात असंख्य क्षमता आहेत .देहरादून ते दिल्ली या स्पाईस जेट्स विमान प्रवासात बायो एविएशन फ्युएलचा वापर करण्यात आला . देशाचे शेतकरी आता परळी, राइस हस्क यापासून बायोएविएशन इंधन तयार करू शकतात, अशी माहिती गडकरींनी दिली.
एम्फिबीयस सीप्लेनअर्थात जमिनीवर आणि पाण्यावर चालणारे उभयचर विमान याची आवश्यकता जल आणि वायूमार्गाद्वारे प्रवासी वाहतूक खर्च किफायतशीर आणि जलद करण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता दिशा निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे उड्डयन क्षेत्राच्या तज्ञांद्वारे तयार होणे आवश्यक आहे. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचे अंतर्भाव त्याचप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा महसूल वाढवण्यासाठी नवनव्या योजनांचा या क्षेत्रातील हितधारकांनी सखोल विचार करावा, असे त्यांनी यावेळी नमुद केले.
या दोन दिवसीय परिषदे दरम्यान एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा सुरक्षित हवाई प्रवास आणि भारताच्या हवाई उड्डयन क्षेत्रातील विकासाची गाथा या विषयावर विचारमंथन होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule