मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। तपासातील उल्लेखनीय प्रावीण्य आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) सोन्याच्या दागिन्यांच्या रु १.८२ कोटींच्या बनावट दरोडा प्रकरण यशस्वीरित्या उघड केले आहे. सुरुवातीला मोठ्या दरोड्याप्रमाणे नोंदवले गेलेले हे प्रकरण सखोल तपासानंतर काळजीपूर्वक आखलेली बनावट चोरी असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील संपूर्ण मालमत्ता केवळ ७२ तासांत परत मिळवण्यात आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. ३०.०९.२०२५ रोजी गाडी क्रमांक 12187 जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडल्याची नोंद करण्यात आली. श्री. सागर पारेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८२/२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) आणि ३०९(६) नुसार तक्रार नोंदवली. त्यांनी आपल्या तक्रारीत ५२ सोन्याच्या बांगड्या आणि ३५ सोन्याच्या अंगठ्या, एकूण १.५ किलोग्रॅम वजनाच्या आणि किंमत रु १,८२,००,०००/- इतक्या असलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे नमूद केले.
तपासाअंती हे स्पष्ट झाले की, घटना घडलेले ठिकाण जीआरपी पोस्ट खंडवा यांच्या कार्यक्षेत्रात येते, त्यामुळे प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
त्यानुसार, हे प्रकरण दि. ३.१०.२०२५ रोजी जीआरपी खंडवा यांनी त्याच कलमांखाली गुन्हा क्रमांक २१९/२०२५ म्हणून पुन्हा नोंदवले आणि भुसावळ आरपीएफची मदत मागवण्यात आली.
वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ पोस्ट खंडवा, गुन्हे गुप्तवार्ता शाखा आणि आरपीएफ भुसावळ येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक संयुक्त तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण, डिजिटल ट्रॅकिंग, मोबाईल कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि मार्ग नकाशांकन यांसारख्या आधुनिक तपास साधनांचा प्रभावी वापर करून पथकाने घटनेचे सखोल तांत्रिक विश्लेषण केले. तपासातून उघड झाले की कथित दरोडा पूर्णपणे बनावट असून तो फिर्यादीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने अधिकाऱ्यांना दिशाभूल करून खोटा तोटा दाखविण्याच्या उद्देशाने आखला होता.
चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की त्यांनी खोट्या कथेला विश्वसनीयता देण्यासाठी स्वतःला जाणूनबुजून दुखापत केली होती. त्यांनी ही घटना बनावट असल्याचे मान्य करत सांगितले की सोन्याचे दागिने त्यांनी आपल्या साथीदार प्रवीण या व्यक्तीकडे कल्याण रेल्वे स्थानकावर सुपूर्द केले होते.
या माहितीच्या आधारे आरपीएफ पथकाने तत्काळ कारवाई करत प्रवीणला आरपीएफ पोस्ट खंडवा येथे बोलावले, जिथे तो ०४.१०.२०२५ रोजी संपूर्ण मालमत्तेसह हजर झाला. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये ५२ सोन्याच्या बांगड्या आणि ३५ सोन्याच्या अंगठ्या असून त्यांचे एकूण वजन १.६ किलो आणि किंमत सुमारे रु १.८२ कोटी इतकी आहे. संपूर्ण मालमत्ता कायदेशीर नोंदीसह जप्त करण्यात आली.
या प्रकरणातील चार आरोपी हे आहेत:
1. सागर पारेख (वय ४०), राहणार नाशिक, महाराष्ट्र; झवेरी बाजार, मुंबई येथील R.B. Jewellers & Gold Ltd. LLP मध्ये भागीदार.
2. संजय कुमार (वय २७), राहणार पाली जिल्हा, राजस्थान; सध्या राहणार मुंबई.
३. प्रवीण कुमार (वय ३५), राहणार सिरोही जिल्हा, राजस्थान; सध्या राहणार दिवा ईस्ट, ठाणे.
४. राकेश जैन (वय ५३), राहणार मलबार हिल्स, मुंबई.
सर्व चार आरोपींना गुन्हा क्रमांक २१९/२०२५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) आणि ३०९(६) अंतर्गत अटक करण्यात आली असून सध्या भुसावळ विभाग, आरपीएफचे निरीक्षक प्रकाश चंद्र सेन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर