लातूरमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन
लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रात्रभर मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक रस्ते,
अ


लातूर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रात्रभर मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक रस्ते, पूल आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर इतका होता की नागरिकांना घराबाहेर जाणे कठीण झाले असून, रस्त्यांवर वाहतुकीची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे.

निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी आणि बडूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सांगवी, जेवरी, अंबुलगा बुद्रुक तसेच निलंगा ग्रामीण भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. लातूर ग्रामीणमधील मुरुड आणि परिसरातील अनेक भागांतही सकाळपासून पावसाचा जोर कायम होता.सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने पावसामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नदी-नाले ओलांडताना आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.

पाच दिवसांच्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला होता. अनेकांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली होती. मात्र, या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पावसाने पाणी फेरल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande