छत्रपती संभाजीनगर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील तरुणांनी बदलत्या हवामानानुसार रेशीम व दुग्धव्यवसायाकडे वळावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांनी बदलत्या हवामानानुसार रेशीम शेती व दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथील बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला (आरसेटी) भेट दिली. त्याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे, आरसेटीचे संचालक हेमराज बनसोड, रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे, रेशीम शेती प्रशिक्षक नंदकिशोर पुंड, बँक सखी प्रशिक्षक श्री. घेवारे यांची उपस्थिती होती.
शाश्वत उत्पन्नासाठी कमीत कमी खर्चात रेशीम शेती व कीटक संगोपन गृह उभारणी करुन रेशीम शेती कशी करावी. तसेच प्रशिक्षणात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन रेशीम शेती प्रशिक्षक नंदकिशोर पुंड यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis