पालकमंत्र्यांकडून थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
परभणी, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।गेल्या पाच महिन्यांपासून थकीत वेतनाच्या मागणीकरीता सकाळपासून कामबंद आंदोलन सुरु केलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचार्यांचा वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे ठोस आश्वासन जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्या कर्मचार्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
पालकमंत्री साकोरे व भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी महानगरपालिका कार्यालयाच्या आवारात येऊन आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यरत कर्मचारी तसेच सेवानिवृत्तधारकांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकीत आहे. तर शिक्षकांचे सोळा महिन्यांपासून वेतन थकीत आहे, असे स्पष्ट करीत बहुतांशी कर्मचार्यांवर सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सौ. साकोरे-बोर्डीकर यांनी सरकारकडून लवकरात लवकर थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे कर्मचार्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis