जळगाव, 8 ऑक्टोबर, (हिं.स.) | एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी रंगेहात पकडले. शहरातील काव्य रत्नांजली चौकात सापळा रचून ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच भानुदास पुंडलिक मते (रा. खोंडेवाडा, ता. एरंडोल), सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (३८, रा. युनियन बँकेजवळ, एरंडोल) आणि खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील (४९, रा. कल्याणेहोळ, ता. धरणगाव) यांचा समावेश आहे. तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत रिंगणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे अंदाजे १ कोटी ५० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यापैकी १ कोटी २७ लाख रुपये बिलाची रक्कम मिळाली होती, मात्र २३ लाख रुपये प्रलंबित राहिले होते. देयक मिळण्यासाठी आवश्यक असलेला हस्तांतर करारनामा अपूर्ण असल्याने कामकाज अडले होते.
या प्रकरणी सरपंच व सदस्यपती यांनी तक्रारदाराशी चर्चा करत करारनामा पूर्ण करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली, पण नंतर ती ८० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने तत्काळ एसीबीकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासानंतर सापळा रचला आणि मंगळवारी सायंकाळी काव्य रत्नांजली चौकात खाजगी पंटर संतोष पाटील याने तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे आणि कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. एसीबीच्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर