सोलापूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ व्या युवा महोत्सवाचे आज (मंगळवारी) सांगोला महाविद्यालयात उद्घाटन पार पडले. त्यावेळी तेथे आलेल्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना स्टेजवर बोलावून मानपान न दिल्याने वाद झाला. सदस्य सत्कार न स्विकारताच नाराज होऊन तेथून परतले.
प्रत्येक युवा महोत्सवासाठी विद्यापीठाकडून निधी दिला जातो. व्यवस्थापन परिषद ही सर्वोच्च असून तेथील सदस्य तो निधी मंजूर करतात. तरीदेखील, महोत्सवाच्या उद्घाटनात त्या सदस्यांना मानपान दिला जात नसेल तर ते दुर्दैवी आहे. उद्घाटनाला कुलगुरुंसह ठराविक अधिकारी आणि संस्थेचे काही पदाधिकारीच स्टेजवर होते.
अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे पाच-सहा सदस्य उपस्थित होते, त्यांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करावा, एवढीच माफक अपेक्षा होती. मात्र, तसे न करता मोजक्या अधिकाऱ्यांनीच महोत्सवाचे उद्घाटन उरकले. त्यावर नाराजी व्यक्त करत राजा सरवदे, डॉ. विरभद्र दंडे, चन्नवीर बंकुर, मल्लिनाथ शहाबादे आदी सदस्य तेथून निघून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड