
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)प्रत्येक बालकाला सुरक्षित, सन्मानजनक जीवन उपलब्ध करुन त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आपण साऱ्यांचे उत्तरदायित्व आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.हॉटेल अतिथी येथे बाल हक्क संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सल्लागार परिंदर सिंग, बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष रविंद्र ताकनेर, विधी विज्ञान शास्त्राचे विभागप्रमुख राहुल भारती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पांचाळ, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाटकर, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती वारेकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी महादेव डोंगरे आदी उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व रोपट्याला पाणी देऊन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. बालविवाह मुक्त जिल्ह्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, बालकामगार, शाळा बाह्य मुले, कुपोषण अशा विविध समस्या आहेत.या समस्यांच्या सोडवणूकीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध अभियानांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. जनजागृतीवर अधिक भर दिला जात आहे. केवळ कायदे असल्याने प्रश्न सुटणार नाही. लोकांची मने व मते बदलविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने कार्य करावे. येत्या १४ नोव्हेंबर पर्यंत जिल्हा कुपोषण मुक्त करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या सगळ्यांना शासकीय अधिकारी- कर्मचारी म्हणून ही सेवेची संधी मिळालेली आहे. त्यादृष्टिने या कार्यशाळेत मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर करुन बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपले योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis