
ठाणे, 11 नोव्हेंबर (हिं.स.) - देश सुरक्षित हातात आहे, असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनसमोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडविला. या स्फोटात अधिकृतरित्या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे, राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही, हल्ल्याला जबाबदार कोण? अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते.
या प्रसंगी महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांनी, केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवडणुकांच्या काळात स्फोट होत आहेत. म्हणूनच या सरकारने राजीनामा द्यायला हवा, असे सांगितले. प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य म्हणाल्या, एकीकडे देशावर दहशतवादी हल्ले होत असताना आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत. पुलवामाच्या वेळीही डिस्कव्हरी चॅनेलचे शूटींग करीत होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात स्फोट व्हायचे पण भाजपच्या काळात फक्त निवडणुका आल्यावरच स्फोट होतात, याचाच अर्थ हे सरकार निवडणूक जीवी असून हे निवडणूक जिवी सरकार भारतीय जनतेचे जीव घेत आहे. अपयशी ठरलेल्या या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी, अजित डोभाल यांनी आता देशात दहशतवादी हल्ले होत नाहीत, असे म्हटले होते. पण, भाजपच्या काळातच निवडणुका आल्या की स्फोट का घडतात, हा संशोधनाचा विषय आहे. डिसेंबर 2014 पासून आजपर्यंत सुमारे 31 दहशतवादी हल्ले झाले आहेत. पुलवामातील आरडीएक्स कुठून आले हे अद्याप शोधता आले नाही. त्यामुळेच आता एनआयएने निष्पक्ष तपास करून देशाच्या संरक्षणप्रणालीत शिथीलता आणणाऱ्यांना गजाआड करावे, अशी मागणी केली. मकसूद खान यांनी, या स्फोटामागे राजकीय कनेक्शन शोधले पाहिजे. बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हे स्फोट झाले आहेत, असा आमचा आरोप आहे. चौकीदार जर देशाबाहेर असेल तर असे कृत्य घडणारच आहेत. असे म्हटले.
या आंदोलनात महिला जिल्हा कार्याध्यक्षा सबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, संजीव दत्ता, पद्माकर पाटील, मोजम खान, कुलविंदर सिंग सोखी, दिलीप नाईक, वीरेंद्र सिंग, ज्योती निंबारगी, महेश भाग्यवंत, कैलास हावळे, साहिल उदुगाडे, राजेश मिश्रा, दीपक क्षत्रिय, कुणाल भोईर, सुमित साधावानी, सुनिता मोकाशी, मेहरबानो पटेल, जग्गत सिंग, विक्रांत घाग, केतन जाधव,शेखर भालेराव, हर्ष भगत, अभिजित पवार, शैलेंद्र ओहळ, बालेश हत्तंबीरे, हरिवंश चौहान, जतिन कोठारे, जयेश पाटील, धर्मेंद्र अस्थाना, सचिन गोंदुकुपे, रेश्मा भानुशाली, राहुल भालेराव, वैभव खोत ,राजु पाटील, ज्ञानेश्वर राजपंखे, विजय काकडे, सोनाली कदम, शशिकला पुजारी, इक्बाल शेख, विशांत गायकवाड, सिल्वेस्टर डिसोझा , मुर्तुझा अन्सारी, समाधान माने आदी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर