


नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। एनआयटीसारख्या उच्च तांत्रिक शैक्षणिक संस्था आदर्श डिजिटल गावे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील.अशा शैक्षणिक संस्था सोपे तांत्रिक उपाय विकसित करू शकतात, लोकांना डिजिटल कौशल्ये शिकवू शकतात आणि गावांमध्ये चांगल्या सुविधा प्रदान करण्यासाठी उद्योगांसोबत काम करू शकतात.असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
राष्ट्रपती नवी दिल्ली येथे झालेल्या एनआयटी म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीचा पाचवा दीक्षांत समारंभाला उपस्थितीत होत्या.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एनआयटी दिल्लीने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही संस्था आधुनिक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रीत करत आहे हे पाहून, आपल्याला आनंद झाला. बहुविद्याशाखीय शिक्षण, नवोपक्रम, संशोधन, उद्योगांशी सहकार्य आणि कौशल्य-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देऊन, संस्था भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुसज्ज करत आहे.
एनआयटी दिल्लीने उद्योजकता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी एक स्टार्ट-अप केंद्र स्थापन केले आहे, हे पाहून आपल्याला आनंद झाल्याचे नमूद करून राष्ट्रपती म्हणाल्या, यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना त्यांच्या स्टार्ट-अपसाठी आवश्यक संसाधने , मार्गदर्शन आणि ‘नेटवर्क’ तयार करण्याच्या संधी उपलब्ध होतील. येथे एक ‘इनक्युबेशन सेंटर’ देखील स्थापन केले जात आहे, त्यामुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यवहार्य व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि तज्ञांचे मार्गदर्शन प्रदान करणे, शक्य होत आहे. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना सक्षम बनवले जाईल आणि स्वयंरोजगाराची संस्कृती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपण विकसित भारताच्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जात आहोत. ही वचनबद्धता केवळ आर्थिक प्रगतीइतकीच मर्यादित नाही तर त्यामध्ये समावेशक विकास, तांत्रिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा समावेश आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, स्किल इंडिया, सुगम्य भारत अभियान आणि उन्नत भारत अभियान यासारख्या सरकारी उपक्रमांवरून असे दिसून येते की, सार्वजनिक सहभागाने भारत आपल्या ध्येयाच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. या सर्व राष्ट्रीय प्रयत्नांचे उद्दिष्ट एक असा भारत निर्माण करणे आहे, जिथे प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि प्रतिष्ठा मिळेल आणि जिथे वैयक्तिक प्रतिभेच्या संगोपनासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध असेल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पदवीधर विद्यार्थी आता भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक कार्यबलाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. या विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहिले पाहिजे, संशोधन सुरू ठेवण्याबरोबरच, नाविन्यपूर्ण मार्ग शोधत राहिले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. त्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात धाडस दाखवावे, असे त्यांनी सांगितले. खऱ्या प्रगतीचे मोजमाप केवळ शोध नाही तर, त्या शोधाचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम आहे, ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावी, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, शाश्वत ऊर्जा प्रणाली विकसित झाली, सुलभ तंत्रज्ञान निर्माण झाले किंवा ग्रामीण आणि वंचित समुदायांसाठी जीवनोपयोगी उपाय शोधले तरी त्यांचे विचार आणि कृती यांच्यातून असमानता कमी झाली पाहिजे आणि लोकांच्या जीवनात नवीन आशेचा किरण निर्माण करता आला पाहिजे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आज समोर असलेले एनआयटीचे सर्व विद्यार्थी आपल्या कार्याने एनआयटी दिल्ली आणि भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी भविष्यात नक्की करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule