
नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
- युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा सन्मान दिल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाच्या अमृत महाराष्ट्र या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत दुर्गोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
या दुर्गोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांना विश्वविक्रमी मानवंदना देण्याचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी नाशिककरांना आवाहन केले आहे. प्रत्येक घर, सोसायटी, अपार्टमेंट अथवा मोकळ्या जागेत गडदुर्गांची प्रतिकृती साकारून या ऐतिहासिक, अभिमानास्पद उपक्रमात सहभागी व्हावे. या गडदुर्गाच्या प्रतिकृती www.durgotsav.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेद्वारे अपलोड करता येतील. ही प्रक्रिया अत्यंत असून प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबासह यात सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक ही कुंभ नगरी म्हणून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची अनेक दुर्गस्मृती येथे जिवंत आहेत. त्यामुळे नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाला विशेष
महत्त्व प्राप्त झाले आहे. दुर्गोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध दुर्ग उत्सव सार्वजनिक ठिकाणी गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारून त्यासोबत सेल्फी घेऊन तो खालील वेबसाईटवर अपलोड करावा.
यामध्ये जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, नितीन पवार, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी केले आहे.
युनेस्कोने सन्मानित केलेल्या बारा गडकिल्ल्यांचा हा अभिमान नाशिकच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. नाशिककरांचा सहभाग या विश्वविक्रमी उपक्रमासाठी नक्कीच मोलाचा ठरणार आहे, असा विश्वास अमृत दूर्गोत्सवाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV