
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केलं आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे प्रत्युतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतचोरी मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी उघड केला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिंन्ह उभे राहिले आहे. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठे आंदोलनही केले. मुंबईत दोन दिवसापूर्वी निघालेल्या मोर्चातही काँग्रेस पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते व झेंडेही होते पण भाजपा त्यावरही टीका करत आहे, ते चुकीचे आहे. या मोर्चात मी सहभागी होण्याचा मुद्दा गौण असून मतचोरी हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यावेळी म्हणाले की, डॉ. संपदा मुंडे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न भाजपा महायुती सरकार करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी हाय कोर्टाच्या न्यायमुर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन करावी. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी पक्षाचा एक नेताच या प्रकरणात सहभागी असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशीआधी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट दिल्याने राज्य सरकारचे अधिकारी निष्पक्ष तपास कसा करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. संपदा मुंडे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलीसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने गांभिर्याने घेतले आहे. देश पातळीवर आंदोलन केले जात असून भाजपा महायुती सरकारने या प्रकरणी न्यायामूर्तींचा सहभाग असलेली एसआयटी स्थापन केली नाही तर १० नोव्हेंबला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस वर्षा बंगल्याला घेराव घालून तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनातील राज्यभरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व तरुण सहभागी होतील असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनिष शर्मा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, प्रभारी अजय चिकारा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी