
रायगड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे गीत पूर्ण स्वरूपात गाणे बंधनकारक करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून या निर्णयामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. बंकिमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत शाळांमध्ये केवळ दोनच कडवी गायली जात होती, मात्र आता संपूर्ण गीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे.
राजमाता जिजाबाई ट्रस्टने शिक्षण विभागाला पत्र देऊन गीताच्या सर्व कडव्यांचे गायन सक्तीचे करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ. रा. कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. 31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाली असून 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान सर्व शाळांमध्ये गीताचे संपूर्ण गायन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाने या निर्णयामागील उद्देश स्पष्ट करताना म्हटले आहे की, आजच्या पिढीला राष्ट्रगीताचा अर्थ, त्यामागील इतिहास आणि राष्ट्रीय अस्मिता समजणे आवश्यक आहे. ‘वंदे मातरम्’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि मूल्याधिष्ठित शिक्षण विकसित करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात आले.
राज्य मंडळाच्या शाळांची दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर 3 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तथापि, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांच्या भूमिकेवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत “अशा विचारसरणीच्या लोकांनी पाकिस्तानात जावे” असा पलटवार केला आहे. परिणामी, या निर्णयावरून राज्याच्या राजकीय वातावरणात चांगलाच ताप वाढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके