
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज चिपळूण येथे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेशही त्यांनी दिले.
चव्हाण बुधवारी कोकण दौऱ्यावर आले असता चिपळूणमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी परशुराम घाटातून बाइक रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करण्यात आली. भाजप नेते प्रशांत यादव तसेच सौ. स्वप्ना यादव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी यादव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. पूर्ण ताकदीने सर्वजण काम करत आहेत. आगामी निवडणुकांसाठी आपल्याकडून जो आदेश येईल त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. शतप्रतिशत भाजपचा निर्णय घेतला गेला तरी आमची पूर्ण तयारी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर प्रथमच चिपळूणमध्ये आलो आणि येथे झालेला पक्षप्रवेश बघून प्रचंड आनंद झाला. येथे ३०० कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला, माझ्या मते चिपळूणच्या ग्रामीण भागातील असंख्य गावे आज भाजपला जोडली गेली. प्रशांत यादव यांच्या माध्यमातून आपण सर्वजण भाजपच्या प्रवाहात आला आहात. तुम्हाला एक विश्वास देतो यापुढे तुम्हाला पूर्ण सन्मान दिला जाईल. तुम्ही जो विश्वास पक्षावर दाखवला आहात त्याला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येकवेळी तुमच्या पाठी मी खंबीर उभा असेन.भाजप हा विचारधारेचा पक्ष आहे. राष्ट्र प्रथम हे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पारदर्शकपणे कारभार करून देश प्रगतीपथावर नेत आहेत. आपणदेखील तीच विचारधारा पुढे घेऊन जायचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधून आपले विचार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास हा जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही चव्हाण म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली. खालपासून वरपर्यंत एकाच विचारधारेची सत्ता असली पाहिजे, त्या अनुषंगाने आगामी निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या आहेत. नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असो, हे महायुतीचेच असले पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी कामाला लागावे. मात्र २०२९ ला शतप्रतिशतचा नारा श्री. चव्हाण यांनी दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२९ साठी शतप्रतिशतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशांत यादव तुम्ही २०२९ साठी तयार राहा, असे सूचकसंकेतही त्यांनी दिले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी माजी आमदार विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भरण, जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले. तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी