रत्नागिरी : अभिनय-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कोकणातील कलाकारांना अपार संधी : सागर देशपांडे
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूणमध्ये नाट्य संमेलनाच्या निमित्ताने १९९५ साली नाटकाचे बीज रुजले आणि आज ते वृक्षासारखे फोफावले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि भूमिकेतील बदल या कलांचा आता राजकारण आणि समाजकारणातही वापर होत आहे, असे प्रतिपादन जडणघडण
चिपळूण अभिनय कार्यशाळेचा समारोप


रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूणमध्ये नाट्य संमेलनाच्या निमित्ताने १९९५ साली नाटकाचे बीज रुजले आणि आज ते वृक्षासारखे फोफावले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि भूमिकेतील बदल या कलांचा आता राजकारण आणि समाजकारणातही वापर होत आहे, असे प्रतिपादन जडणघडण मासिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. सागर देशपांडे यांनी केले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेची चिपळूण शाखा आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. कार्यशाळेत दिग्दर्शक व कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे उद्घाटन चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झाले. समारोपप्रसंगी परिषद अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, असोसिएट डायरेक्टर इंद्रजित भोसले, उद्योजक शिरीष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. देशपांडे म्हणाले, पूर्वी सराव कार्यशाळा फारशा घेतल्या जात नव्हत्या, मात्र आता अभिनयाच्या प्रशिक्षणाला प्रगतीचा नवा वेग मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाटकांची खरी परंपरा कोल्हापुरातून सुरू झाली. खाडिलकर, देवल, विष्णुदास भावे यांच्या कार्यातून ती समृद्ध झाली. हीच परंपरा आता कोकणातही नवे रूप घेत आहे. अभ्यासपूर्वक प्रयत्न केले, तर या क्षेत्रात कोकणातून क्रांती घडू शकते.

देशपांडे म्हणाले, जगात सध्या ७ हजारांहून अधिक बोली भाषा बोलल्या जातात. त्यातील ७० ते ८० भाषा दरवर्षी नष्ट होतात. मराठी ही जगात १५ व्या क्रमांकावर असून १२ ते १३ कोटी लोक ती बोलतात. ही भाषा, तिचे नाटक आणि तिचा चित्रपट यांचे अस्तित्व टिकवणे आपली जबाबदारी आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट क्षेत्रात आपल्याकडे गुणवत्ता असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

कार्यक्रमात सहभागी कलाकारांच्या वतीने संजय वाजे आणि मीरा पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande