
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : स्वतंत्र आणि व्यापक विचार हाच स्वतंत्र कोकण अभियानाचा ध्यास आहे, असे विचार संस्थापक संजय कोकरे यांनी मांडले.
कोकणातील सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 100 सामाजिक कार्यकर्त्यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सन्मान सोहळ्यात 'कोकण रत्न' पदवी प्रदान केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, सागर किनारी प्रांत म्हणून राज्यांची निर्मिती होत असतानाच अनेकांनी स्वतंत्र कोकण राज्य असावे, अशी मागणी केली होती. कालांतराने आपल्या प्रांताचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे आली. आमचे अभियान महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी नाही, तर स्वतंत्रपणे स्वाभिमानी वंचित कोकणी माणसासाठी नवी दिशा देणारी चळवळ आहे. ही संकल्पना नव्या पिढीने स्वीकारली असून सोशल माध्यमाचे यश आहे.
यावेळी पत्रकार सचिन कळझुनकर, धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे, दिलीप लाड आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातून शाहीर शाहिद खेरटकर, संजय सुर्वे, दिनेश दळवी, प्रा चिलवान, इकलाक खान यांची निवड करण्यात आली होती. सन्मानपत्र, पदक देऊन त्यांना गौरवण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी