
जळगाव, 16 डिसेंबर, (हिं.स.) जळगावच्या भडगाव शहरामधून एक हृदयदायक घटना समोर आलीय. आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडल्याने दोन चिमुकली बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे) अशी मयत बालकांची नाव असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली. नागरिकांमध्ये शाळेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भडगाव शहरातील आदर्श कन्या शाळेतील नर्सरी वर्गात शिकणारे हे दोन चिमुकले विद्यार्थी खेळत असताना किंवा वर्गाबाहेर असताना शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ पोहोचले.खेळताना अचानक तोल गेल्याने ते भिंतीवरून थेट जवळच्या नाल्यात कोसळले. नाल्याच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचे मृतदेह फुगून आल्यावर ही गंभीर घटना उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व नागरिकांनी शाळेत धाव घेतली. परिसरात शोक व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप दोन जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणामुळे गमावले गेल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही जाळी अथवा सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्या वेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर