परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)।परभणी जिल्ह्यातील मौजे ठोळा परिसरासह दामपुरी, माळसोन्ना, खरबडा, पोरवड, ससपुरजळा, लोहगाव, रेणकापुर, बामणी आदी ग्रामीण भागात झालेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व भागांतील शंभर टक्के पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पूरामुळे केवळ शेतीच नाही तर घर, गुरेढोरे, उपजीविकेची साधने सर्वस्व वाहून गेले आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकरी अक्षरशः पोरके झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या भागाला ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केली आहे. जाधव यांनी म्हटले आहे की, आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांना वाचविण्यासाठी सरकारने हेक्टरी किमान 50 हजार रुपये अनुदान द्यावे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 100 टक्के मदत द्यावी. शेतकरी जगला तर देश जगेल, कारण सर्व काही शेतकऱ्यावरच अवलंबून आहे.
दरम्यान, पूरस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मदत व बचाव कार्य करण्यासाठी ठोळा ग्रामपंचायतचे सरपंच नाना वामनराव खोंड व त्यांची टीम सक्रिय आहेत. मात्र, शासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत न मिळाल्यास या शेतकऱ्यांचा अंत पाहावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती आर्थिक मदत आणि पुनर्वसन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis