रायगड : खालापूर तालुक्यातील उजाला हॉटेलवर कारवाईची मागणी
रायगड, 29 सप्टेंबर (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील उजाला हॉटेल चौक येथील दुकानात वडापाव खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या ताटात मोठी बेपर्वाई समोर आली आहे. वडापावसोबत दिल्या जाणाऱ्या चटणीत मेलेली पाल आढळल्याने ग्राहक स्तब्ध झाला. या प्रकारामुळे परिसर
रायगड : खालापूर तालुक्यातील उजाला हॉटेलवर कारवाईची मागणी







रायगड, 29 सप्टेंबर (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील उजाला हॉटेल चौक येथील दुकानात वडापाव खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या ताटात मोठी बेपर्वाई समोर आली आहे. वडापावसोबत दिल्या जाणाऱ्या चटणीत मेलेली पाल आढळल्याने ग्राहक स्तब्ध झाला. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित दुकानाविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्राहक उजाला हॉटेल येथे वडापाव खाण्यासाठी गेले होते. वडापावसोबत दिलेल्या हिरव्या चटणीमध्ये अचानक काहीतरी विचित्र असल्याचे लक्षात आले. बारकाईने पाहिल्यानंतर त्या चटणीत मेलेली पाल असल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकाने तत्काळ दुकानदाराचे लक्ष वेधले असता, कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र, उपस्थितांनी गोंधळ घातल्याने दुकान व्यवस्थापनाला माफी मागावी लागली.
अन्न पदार्थात अशा प्रकारे कीटक आढळल्याने अन्नसुरक्षेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राहकांनी या प्रकाराचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने घटना काही वेळातच चर्चेचा विषय ठरली. स्थानिक पातळीवर अनेक नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, अनेक ग्राहक दररोज या हॉटेलमध्ये भोजनासाठी येत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून व्यवसाय केला जात आहे. प्रशासनाने अशा निष्काळजीपणाला वाव दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे नागरिकांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके

 rajesh pande