यवतमाळ, 29 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा काही प्रयत्न सुरू आहे का, हे शोधावे लागेल. असे प्रयत्न जाणीवपूर्वक होत असावेत आणि त्यामागील सूत्रधार शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अहिल्यानगरमध्ये मुस्लीम धर्मगुरुंच्या नावाची रांगोळी काढून त्याची विटंबना करण्यात आली. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेविरोधात आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली.
फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई, वसईसह काही ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर किंवा कृती झाल्याचे दिसून आले आहे. “लोकसभा निवडणुकीपूर्वी जसे काही प्रयत्न झाले, त्याच धर्तीवर समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, याकडे लक्ष द्यावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. आंदोलकांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलन सुरूच राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी